Wednesday 15 March 2017

'पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ'...

'पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ'...

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे एमजीएमच्या आईन्स्टाईन सभागृहात रविवार १२ मार्च २०१७ रोजी 'पाच राज्यांतील निवडणूक निकालांचा अन्वयार्थ' यावर परिसंवाद घेण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रा. जयदेव डोळे, प्रविण बर्दापूरकर, पत्रकार अमेय तिरोडकर, एमजीएमचे विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे, प्राचार्या डॉ. रेखा शेळके, प्रतिष्ठानच्या सदस्या रेणुका कड, सुबोध जाधव, सुहास तेंडुलकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यशवंतरावांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर श्रीकांत देशपांडे यांनी संवादकाच्या भूमिकेतून तज्ज्ञांना बोलते केले. 

उत्तर प्रदेशांतील निकालांनी बहुसंख्याकवादाचा धोका वाढल्याचा सूर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई- विभागीय केंद्र औरंगाबाद आयोजित परिसंवादात राजकीय विश्लेषकांनी काढला. सूक्षम प्रचातंत्र आणि घटनाबाह्य सत्ताकेंद्राच्या मदतीने निवडणूक जिंकण्याचे तंत्र भाजपने विकसित केले असून, व्हॉट्सअॅप, टि्वटर, फेसबुक आणि टीव्हीशी सतत कनेक्टेड असलेल्या १४ टक्के तरुणासमोर मोदी यशस्वीपणे कनेक्ट होतात, हे या यशाचे गमक असल्याचे ते म्हणाले. 
प्रवीण बर्दापूरकर यांनी उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांचा आढावा घेत परिसंवादास सुरुवात केली. ते म्हणाले, "उत्तर प्रदेशात हिदू मुस्लीम तेढ, ब्राह्मण, दलित आणि यादव यांच्याभोवती सर्व राजकारण केंद्रीत असते. छोट्या जातींची मते मिळविण्यासाठी भाजपने बसपातून मौर्यांना फोडले. कुर्मी, लोथ, मल्लाव, गुर्रियोज, कुंभार अशा दोन ते तीन टक्के बळच्या जातींची मोळी बांधली."

यशवंतरावांच्या विकासविषयक उद्गारांचे श्रोत्यांना स्मरस करुन देत प्रा. जयदेव डोळे यांनी आपले विश्लेषण केले. ते म्हणाले, "संघाचा अजेंडा पूर्ण ताकदीने राबविण्याची सुरुवात उत्तर प्रदेशापासून झाली आहे. एकाही मुस्लीम उमेदवाराला तिकीट न देता आपण १०० टक्के हिंदू पक्ष म्हणून उदयास येत आहोत, हा संदेश भाजपने दिला आहे. अखिलेश यादवने महिला, युवक यांना केंद्रस्थानी ठेवून विकासाचे राजकारण करण्याचा, पक्षातील गुंडगिरी दूर करण्याचा प्रयत्न केला, हे कुणी सांगत नाही, भाजपने पैसा, गुंडगिरी, जात या सगळ्यांचा वापर केला. सत्ता आल्यानंतर संविधानातील तरतुदींना सुरुंग लावण्याचा प्रयत्न होण्याची भीती आहे. भाजपेतर विचारांची ताकद गोळा करून पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये उभे राहावे लागेल." असे सांगत प्रा. डोळे यांनी यशवंतरावांच्याच पुस्तकातील परिच्छेदानने भाषणाचा समारोप केला. 
तर "उत्तर प्रदेशात भाजपने बिगर यादव ओबीसी आणि बिगर जाटव दलित यांची मोट बांधली आणि यश मिळविले. २०१४ चा परफॉर्मन्स पुन्हा दाखविणे अवघड काम आहे," असे निरिक्षण पत्रकार अमेय तिरोडकर यांनी वर्तविले. "पंजाबात आम आदमी पक्षाने खलिस्तान समर्थकांना तिकिटे दिल्याचे अहवाल आहेत. त्यामुळे तिथे आप हरणे आवश्यक होते, असेही श्री तिरोडकर म्हणाले.

श्रीकांत देशपांडे यांनी तिन्ही वक्त्यांच्या विश्लेषणातील मुद्यांना स्पर्श करत आपली निरीक्षणे मांडली. सुहास तेंडुलकर यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment