Monday 27 November 2017

यशवंतरावांचे निर्णय राज्याला समृध्द करणारे

सोलापूर : कृषी, उद्योग आणि जलसिंचन यात यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राला समृध्द करणारे ठरले आहेत. त्यांच्यामुळेच ख-या अर्थाने राज्याची प्रगती झाली आहे, असे विचार डॉ. शंकरराव साळुंखे यांनी व्यक्त केले.

शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, सोलापूर आणि वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. साळुंखे बोलत होते. या प्रसंगी विभागीय केंद्राचे अध्यक्ष डॉ. गो. मा. पवार, प्राचार्य डॉ. चंद्रकांत चव्हाण, विभागीय केंद्राचे सदस्य दत्ता गायकवाड, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, केंद्राचे सचिव दिनेश शिंदे, प्रा. संगमेश्वर नीला आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. गो. मा. पवार यांनी यशवंतरावांचे व्यक्तीमत्त्व नव्या पिढीला समजणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत आपले विचार मांडले.

डॉ. साळुंखे म्हणाले, समाजकारण आणि राजकारण करताना अनेक चढाओढींना यशवंतरावांना तोंड द्यावे लागले. द्विभाषिक राज्य आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्याबाबत गैरसमज निर्माण झाले होते. परंतु महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी यशवंतराव पंडीत नेहरूंना हे सारे पटवून देण्यात यशस्वी झाले. केवल प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याचे कौशल्य यशवंतरावांनी साध्य केल्यामुळे ते शक्य झाले. आधूनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण, गृह, परराष्ट्र आदी महत्त्वाची खाती संभाळून त्याला योग्य दिशा देण्याचे काम यशवंतरावांनी केले. कला, साहित्य यासाठी त्यांचे योगदान मोठे असून कृषी उद्योग आणि जलसिंचन यात यशवंतरावांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राला समजणे कठीण आहे, असे ही ते म्हणाले. चव्हाण यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. डॉ. रेखा ओव्हाळ यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. 

Sunday 26 November 2017

आनंदी जगण्यासाठी सुसंवाद, सकारात्मक मानसिकता, सात्विक आहार व व्यायामाची गरज - डॉ. मनोज चोपडा

नाशिक : आजच्या धावपळीच्या जगात जीवनशैलीत वेगाने बदल होत असून ताण-तणावाचे वाढते प्रमाण, सकारात्मक जीवनशैलीचा अभाव, सोशल मिडीयाच्या अतिवापरामुळे आलेले नैराश्य, उदासिनता, व्यायामाचा अभाव, व्यसनांचे वाढते प्रमाण, विसंवाद यामुळे हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून ते रोखण्यासाठी आनंदी जीवनासाठी निसर्गाशी मैत्री करून सात्विक आहार, मेडीटेशन, त्याचबरोबर आपल्या मर्यादा ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी केले.

महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 33व्या पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांचे जीवनशैली व हृदयरोग या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक,विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर येथे सदर व्याख्यान संपन्न झाले.

ते पुढे म्हणाले की आज ग्लोबल वॉर्मिंग, वाढते ध्वनी प्रदुषण, औद्योगिक प्रदुषण यांचा परिणाम जीवनशैलीवर होत आहे. आज तरूण वयातच हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह यांचे प्रमाण वाढत आहे. ते रोखण्यासाठी तेल, तूप, साखर, मैदा, मीठ यांचे आहारातील प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर योगा, स्वत:साठी वेळ देणे, आवडीचे छंद जोपासणे यांमुळे ताणतणाव कमी करण्यासाठी मदतच होते. शरीर हे जैविक घड्याळ आहे. ते योग्य रितीने चालण्यासाठी जीवनशैलीत शिस्त आणणे महत्त्वाचे आहे. नियमित आरोग्य तपासणी आहाराच्या वेळा निश्‍चित करणे, प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे. वेळेचे व्यवस्थापन करून आनंदी मनाने काम करण्याचे कौशल्य साधता आले पाहिजे. तिच खरी आनंदी जीवनाची गुरूकुल्ली आहे असेही डॉ. चोपडा पुढे म्हणाले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. डॉ. मनोज चोपडा यांचा परिचय प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा यांनी केला. तर सन्मान प्रतिष्ठानचे सदस्य अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केला. डॉ. रश्मी चोपडा यांचा सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सदस्य कविता कर्डक, तसेच डॉ. वासुदेव भेंडे, डॉ. मनोज शिंपी, अमर भागवत, गिरीष देवस्थळी, मंगला कमोद, कैलास पाटील, डॉ. सुभाष पवार, विनायक रानडे, रमेश देशमुख आदी उपस्थित होते.

अहमदनगर केंद्रातर्फे यशवंतराव चव्हाणची ३३ वी पुण्यतिथी साजरी...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांची ३३ वी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी केली. तसेच स्व.यशवंतराव चव्हाण यांचे विचार तरूण पिढाला ज्ञात व्हावेत म्हणून स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे साहित्य, संस्कृती, शिक्षण, समाजकारण, संरक्षण या क्षेत्रातील योगदानातून महाराष्ट्राने जी घोडदौड केली आहे ती अहमदनगर केंद्रातर्फे विविध उपक्रमांतून दाखविण्यात आली. स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र उभा करण्याचे काम ग्रामीण भागात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबई विभागीय केंद्र अहमदनगरच्या माध्यमातून सुरू आहे आज २५ नोव्हेंबर २०१७ रोजी स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांची ३३ वी पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा,वाचन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान ही आयोजित करण्यात आले होते.

वार्षिक शिक्षण परिषद संपन्न...

शिक्षण विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक शिक्षण परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये सेमी-इंग्रजी : काळ, आज आणि उद्या या विषयावर आज दिवसभरात चर्चा करण्यात आली. ह्या कार्यक्रम शनिवारी रंगस्वर' चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान, मुंबई, जन. जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई येथे राज्यभरातून आलेल्या शिक्षकांच्या उपस्थित पार पडला. या कार्यक्रमामध्ये डॉ.कुमुद बन्सल यांना उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार देण्यात आला आणि व्हाट्सअँपच्या चर्चा-शिक्षण विकासाच्या या शिक्षण विकास मंच या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सेमी इंग्रजी बद्दल विद्यार्थी आणि शिक्षक यांचा टॉक शो झाला याचे सूत्रसंचालन सुदाम कुंभार यांनी केले. त्यानंतर स्वागत व कार्यक्रमाची रूपरेषा बसंती रॉय यांनी केले. कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सेमी आणि मराठी याबद्दल लोकांना मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले. तर डॉ. वसंत काळपांडे यांनी सेमी-इंग्रजी : काळ, आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन केले. नंतर राज्यातील काही तुरळक शाळांनी केलेले प्रयोग दाखविण्यात आले. प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी त्यांच्या काळातील शिक्षण क्षेत्रातील अनुभव लोकांना सांगितले.

लवकरच वयाची १०० वर्ष पूर्ण करणारे भुजंगराव कुलकर्णी यांना यशंवतराव चव्हाण राज्यस्तरीय २०१७ पुरस्कार प्रदान...

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शुक्रवारी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी पार पडला. त्यावेळी खासदार व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी स्वागत व प्रास्ताविक म्हणून प्रतिष्ठानवतीने शिक्षण, आरोग्य, अपंग व इतर उपक्रमाविषयी थोडक्यात आढावा घेतला यामध्ये विधवा महिला पुनर्वसन उपक्रम 'उमेद'च्या माध्यमातून त्यांची मदत करणे त्यांना जगण्याची उमेद देणे. शिक्षण व शिक्षणक्षेत्रात होणारे बदल प्रतिष्ठानच्या माध्यामतून राबविणे अशा अनेक उपक्रमाविषयी माहिती दिली. तसेच पुढील वर्षी ‘युवा संवाद यात्रा’च्या माध्यामातून यशवंतराव चव्हाण यांची ओळख युवा पिढीला होण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कॉलेजेसमधून चर्चासत्राचे आयोजन केले जाईल असे यावेळी सांगितले. या कार्यक्रमध्ये वि.का. राजवाडे यांच्या संकेतस्थळाचे अनावरण व सदानंद मोरे लिखीत..“लोकमान्य ते महात्मा”या पुस्तकांचे प्रकाशन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात १२ मार्च २०१८ रोजी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रोफेसर एम. एम शर्मा यांना दिला जाईल अशी घोषणा पुरस्कार समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी केली.
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०१७
यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्त दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्सस्तरीय पुरस्कार २०१७' थोर प्रशासकीय सेवक भुजंगराव कुलकर्णी यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शरद पवार यांनी सांगितले की भुजंगराव कुलकर्णी हे दोन महिने अकरा दिवसांनी वयाची १०० वर्षपूर्ण करत आहेत असे सांगितले. या कार्यक्रमासाठी नेहरु सेंटरचे सतिश सहानी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरिश मिश्रा यांनी केले

Friday 24 November 2017

३३ व्या पुण्यतिथी निमित्त भव्य पदयात्रा

कराड यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र कराड यांच्या संयुक्त विद्यमाने देशनेते यशवंतरावजी चव्हाण यांची ३३ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शनिवारी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ४ वाजता कराड मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रा मार्ग विरंगुळा-विजय चौक-टिळक हायस्कूल-कन्याशाळा-चावडी चौक-समाधी स्थळ असा असेल. त्यानंतर समाधी स्थळी पुष्पांजली व सन्माननियांची आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम होईल. भव्य पदयात्रे मध्ये अधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटिल आणि मोहनराव कृष्णाजी डकरे यांनी केले आहे. 

मा. यशवंतराव चव्हाण यांची ३३ वी पुण्यतिथी...

आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व धुरंधर राष्ट्रीय नेते मा. यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ वी पुण्यतिथी निमित्त शनिवारी दिनांक २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमांचे आयोजन चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईन्ट मुंबई येथे करण्यात आले आहे.
असे कार्यक्रम होतील, वि. का. राजवाडे यांच्या साहित्याच्या वेबसाईटचे उद्घाटन, "लोकमान्य ते महात्मा" या पुस्तकाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन, यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०१७ प्रदान करणे, राज्यस्तरीय पारितोषिक स्वीकाराचे भाषण, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१७ जाहीर करणे, अध्यक्षांचे भाषण.

Thursday 23 November 2017

तृतीयपंथींसाठी राज्यस्तरीय स्वतंत्र धोरण असावे- कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे

मागील आठवड्यात एकल महिलांसाठी 'स्वतंत्र धोरणाची आवश्यकता' या विषयावर चव्हाण सेंटर मध्ये राज्यभरातल्या महिलांसोबत कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली होती. चर्चेमध्ये तृतीयपंथींचा सुध्दा समावेश होता. त्याअनुशंगाने आज दुपारी तृतीयपंथीयांच्या शिष्टमंडळाने प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची शिक्षण, व्यवसाय आणि नोकरी अशा ब-याच समस्यांसाठी भेट घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तृतीयपंथींसाठी राज्यस्तरीय स्वतंत्र धोरणाची मागणी करणार असल्याचं शिष्टमंडळाला सांगितलं.

स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती रेखाचित्र दालनाचे शुक्रवारी उद्घाटन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व मराठवाडा साहित्य परिषदेचा संयुक्त उपक्रम

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र,औरंगाबाद व मराठवाडा साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जीवनविषयक कार्याचा वेध घेणार्‍या रेखाचित्र दालनाचा उद्घाटन समारंभ आदणीय यशवंतराव चव्हाण यांच्या 33 व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येस शुक्रवार, दि. 24 नोव्हेंबर 2017 रोजी सायं. 5 वा. आयोजित केला आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांच्या हस्ते होणार असून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील, नंदकिशोर कागलीवाल, मुकुंद भोगले, मधुकरअण्णा मुळे, सचिन मुळे, दादा गोरे, कुंडलीक अतगिरे ,सुनिल किर्दक, दासू वैद्य, बिजली देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित या प्रदर्शनात एकूण 28 रेखाचित्रे असून, त्यामध्ये शिवनेरी गडावर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांच्या प्रतिमेचे अनावरण प्रसंगाची चित्र मालिका, महाराष्ट्राचा मंगल कलश आणल्या गेला त्या प्रसंगाची चित्रमालिका त्याच बरोबर संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी व राज्यनिर्मितीचा आनंद सोहळा असे एकूण 28 रेखाचित्रांमधून मा. यशवंतराव चव्हाण साहेबांचा जीवनपट या चित्र मालिकेत उलगडून दाखविण्यात आला आहे. सदरील चित्रप्रदर्शन कायमस्वरूपी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या विशेष कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय केंद्र औरंगाबादचे सचिव नीलेश राऊत, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर,डॉ. रेखा शेळके, सुबोध जाधव, रेणुका कड,श्रीकांत देशपांडे,मंगेश निरंतर,गणेश घुले,मयूर देशपांडे आदींनी केले आहे.

Monday 20 November 2017

सहकारी गृहनिर्माण संस्था समस्या जीएसटी या विषयावर एकदिवशीय माहिती कार्यशाळा


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे "सहकारी गृहनिर्माण संस्था" कायदा, नियम आणि जीएसटी यासंदर्भात एकदिवशीय माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये कायदा आणि नियम यासंदर्भात प्रभाकर चुरी तर जीएसटी विषयावरती अजीत जोशी हे २ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ ते ५ यावेळेत प्रक्षिणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होण्या-या प्रक्षिणार्थीं कडून २५० रूपये शुल्क आकारले जाईल. ही कार्यशाळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई जन.जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होईल. या कार्यशाळेसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. संपर्क - ८२९१४१६२१६, २२०४५४६०.

दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने वाटप


सासवड येथे आज अपंग बांधवांना कृत्रिम अवयव व साधने वाटप करण्यात आले. आज या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद बघून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अपंग हक्क विकास मंचामार्फत आम्ही अपंग बांधवांच्या हक्कासाठी, सक्षमीकरणासाठी करत असलेल्या कामाचे समाधान वाटतं असल्याचे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
जुलै महिन्यात बारामती येथे दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व साधने वाटपासाठी मोजमाप नोंदणी शिबिरे घेण्यात आली होती, या शिबिरात अपंग व्यक्तींना आवश्यक साधने व कृत्रिम अवयव देण्यासाठी नोंदणी करण्यात आली होती आणि मोजमाप घेण्यात आले होते. या शिबिरात बारामती तालुक्यात ३०८, दौंड तालुक्यात २५२, इंदापूर २३४, पुरंदर २७१, भोर ४५४, पौड २४४, खडकवासला ५९६ जणांची नोंदणी झाली होती. या सर्वांना या कार्यक्रमात कृत्रिम अवयव व साधने यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अपंग हक्क विकास मंचचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Sunday 19 November 2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे यंदाचा राज्यस्तरीय पारितोषिक श्री. भुजंगराव कुलकर्णी यांना जाहीर..

त्यांचा थोडक्यात परिचय


भुजंगराव आप्पाराव कुलकर्णी मूळचे बीड जिल्हा परळी तालुक्यातील पिंपळगावचे. ५ फेब्रुवारी १९१८ चा त्यांचा जन्म. अंबाजोगाई, संभाजीनगर ते हैदराबाद असा त्यांचा शैक्षणिक प्रवास. १९३९ मध्ये त्यांनी हैदराबाद राज्याच्या प्रशासकीय सेवेत कारकीर्दीला सुरुवात केली. हैदराबाद राज्यातच ते उपसचिव पदापर्यंत पोहोचले. पुढे देश स्वतंत्र झाला, मराठवाडाही निजामाच्या जोखडातून मुक्त झाला तेव्हा भुजंगरावांची कारकीर्द ही नांदेडच्या जिल्हाधिकारीपदापासून सुरू झाली. संभाजीनगरातही ते १९५६ ते १९५९ या कालावधीत जिल्हाधिकारी होते. पुण्याचे मनपा आयुक्त, मुंबईचे विभागीय आयुक्त अशी पदे भूषवत ते जनगणना मोहिमेचे प्रमुख, मंत्रालयात नगरविकास, आरोग्य, गृहनिर्माण आणि जलसंपदासारख्या विभागाचे सचिव होत १९७४ मध्ये शासकीय सेवेची ३५ वर्षे पूर्ण करीत ते निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीलाही आज ४३ वर्षे पूर्ण झालेली आहेत. आपल्या खात्याचा अतिशय बारकाईने अभ्यास करीत. खात्यांतर्गत सुधारणा घडवून आणण्यात भुजंगरावांचा हातखंडाच होता. शासकीय सेवेत असताना मनाजोगे सामाजिक कार्य करताना काही बंधने असतात, भुजंगराव या बाबतीत असे सुदैवी की, शासकीय सेवेच्या कार्यकाळात यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादांसारखे पारखी नेतृत्व लाभले होते, तर पद्मविभूषण गोविंदभाईंसारखी अतिशय तळमळीने मराठवाड्याच्या विकासाला वाहून घेतलेल्या मंडळींची त्यांना निवृत्तीनंतर प्रदीर्घ काळ सोबत लाभली. त्याच संस्कारांचे परिणाम म्हणून की काय आज शंभराव्या वर्षात पदार्पण करतानासुद्धा भुजंगराव हे मनाने तरुण आणि खंबीरच आहेत. निवृत्तीनंतर भुजंगराव कुलकर्णी यांनी गोविंदभाईंच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. शासनानेही त्यांच्या अनुभवाचा वापर करून घेत त्यांच्यावर अनेक प्रकारच्या जवाबदाऱ्या सोपवल्या. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, न्हावाशेवा बंदराचे अभ्यासप्रमुख, कुटुंब नियोजन अभ्यासगट प्रमुख, मागास जिल्हे अभ्यासगट अध्यक्ष, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष, बॅकलॉग समितीचे अध्यक्ष तर सिंचन आयोग, कापूस एकाधिकार, अनुशेष अभ्यासक दांडेकर, उत्पन्न बाबींची अभ्यास समिती, राज्य नियोजन मंडळ, तांत्रिक शिक्षण अनुशेष समिती, नोकऱ्यातील अनुशेष शोध समिती, विद्यापीठ स्थापना समिती यासारख्या अनेक समित्यांचे ते सदस्य होते. एका परीने निवृत्तीनंतरही त्यांनी विविध समित्यांवर, मंडळांवर तब्बल २६ वर्षे अर्धशासकीय कामच केले. गोविंदभाईंमुळे भुजंगराव सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत आले आणि कायमस्वरूपी ते या संस्थेचे होऊन गेले. संस्थेचे ते तब्बल २३ वर्ष उपाध्यक्ष होते. धर्माचे अवडंबर न माजवता धार्मिक वृत्तीने जगणे त्यांनी अंगीकारलेले असल्यामुळे जेव्हा सरस्वती भुवनच्या इमारतीचे काम पूर्ण झाले तेव्हा नव्या वास्तूची वास्तुशांती झाली पाहिजे असे शाळेत शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या पालकांना वाटत होते. मात्र संस्थाध्यक्ष बापूसाहेब काळदातेंनी वास्तुशांतीस नकार दिला. मात्र पालकांची अडचण ओळखून भुजंगरावांनी वास्तुशांतीला केवळ मान्यताच दिली नाही तर स्वतः प्रत्येक धार्मिक विधीमध्ये सहभागही घेतला. आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना ते म्हणतात, नियमित योगासने, आयुष्यभर शाकाहार, मद्यपान, धूम्रपानापासून कायम दूर, कोणत्याही कामात सतत गुंतवून घेण्याची सवय, पुस्तक वाचन आणि लेखन हे आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे. चार प्रकारचे प्रत्येकी १३ पत्ते असतात. यात डाव येण्याची लाखात एकदाच वेळ येते. तुमच्या वाट्याला चांगले पत्ते असतील किंवा नसतीलही. मात्र हातात आहे त्या पत्त्यावर चांगल्यात चांगला डाव खेळणे आपल्या हातात असते. ब्रिजमधील हेच कौशल्य जीवनातही वापरावे लागते, अशा शब्दांत भुजंगराव आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतात.

यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्त 'जीवनशैली आणि हृदयरोग' या विषयावरती व्याख्यान



नाशिक : यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पूर्वसंध्येला 'जीवनशैली आणि हृदयरोग' या विषयावर डॉ. मनोज चोपडा (ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ) यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी २४ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे होईल. या कार्यक्रमाला अधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय केंद्र, नाशिक यांच्या कडून करण्यात आले आहे. 

Friday 17 November 2017

‘चित्रपट चावडी’ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘द मॅन विदाऊट पास्ट’


नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार 18 नोव्हेंबर 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुप्रसिद्ध फिनलँडचे दिग्दर्शक अकी कौरीस्माकी यांचा ‘द मॅन विदाऊट पास्ट’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-422013 येथे दाखविण्यात येणार आहे.
फिनलँडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अकी कौरीस्माकी हे त्यांच्या सहज सुंदर, हलक्या फुलक्या, नर्मविनोदी परंतु तितक्याच चमत्कृतीपूर्ण चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची प्रमुख पात्रे सर्व सामान्य फिनलँडर असतात. सर्व सामान्यांची सुख:दुखे:, त्यांच्या जीवनातील चढउतार ते तटस्थपणे नेटकेपणाने टिपतात. हा चित्रपट एका वेल्डरची गोष्ट आहे. काही चोरटे पार्कमध्ये त्याच्यावर हल्ला करतात. डोक्यावरील आघाताने मृत्यु व नंतर तात्पुरती विस्मृती आलेला चित्रपटाचा नायक जणु पुर्नजन्म घेऊन नवे आयुष्य शोधतो. त्यात गत आयुष्याच्या खुणा सापडतात का? हे जाणून घेण्यासाठी पहायला विसरू नका ‘द मॅन विदाऊट पास्ट’
2002 मध्ये फिनलँड येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी 97 मिनीटांचा आहे.
‘द मॅन विदाऊट पास्ट’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.
                                                                                     माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील
होणारे बदल शिकण्याची तयारी ठेवा - डॉ. अच्युत गोडबोले

सध्या जगात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत. ते बदल शिकण्याची तयारी ठेवा अन्यथा त्या क्षेत्रातून तूम्ही बाहेर फेकला जाऊ शकता असं मत संगणक तज्ज्ञ संगणकतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांनी 'इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी काल-आज-उद्या' या विषयावर चव्हाण सेंटर मध्ये व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत एकविसावे पुष्प, संगणकतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांचे 'इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी काल-आज-उद्या' या विषयावर चव्हाण सेंटर मध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला त्यांनी माहिती तंत्रज्ञान काय आहे हे गोडबोले यांनी विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले. त्यानंतर पुढील २० वर्षांत काय बदल होईल हे सांगू शकत असेही ते म्हणाले. १९६०, १९७०, १९८० आणि १९९० या काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कसे बदल झाले आणि त्याचे परिणाम काय झाले या विषयावर सुध्दा त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले.
खासकरून त्यांनी १९८० च्या काळात घडलेल्या या गोष्टी सांगितल्या, पर्सनल संगणक तयार झाला तो ही कमी आकाराचा, त्यानंतर तो घरोघरी दिसायला लागला. माऊस आला आणि त्यानंतर लोकांचा संगणकावरचा विश्वास वाढला. 

Thursday 16 November 2017

२५ नोव्हेंबरला वार्षिक शिक्षण परिषद

शिक्षण विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक शिक्षण परिषद आयोजीत केली आहे. या परिषदे मध्ये सेमी-इंग्रजी : काळ, आज आणि उद्या या विषयावर चर्चा होणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी दिनांक २५ नोव्हेंबर २०१७ सकाळी  ९.३० ते ५.३० या वेळेत रंगस्वर' चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान, मुंबई, जन. जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई येथे होईल. या कार्यक्रमामध्ये 'शिक्षण विकास मंच' चे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे आणि बसंती रॉय उपस्थितांना मार्गदर्शन करतील.    

Tuesday 14 November 2017

व्हेज बिर्याणी पुलाव महोत्सवाचा शानदार समारोप


नाशिक : रविवारचा सुट्टीचा दिवस, गप्पा, मित्रपरिवार, कुटुंबियांचा ओघ विश्वास लॉन्सवर सुरू होते. बिर्यानी अनोखा स्वाद घेत वातावरण आनंददायी दिसत होते. बिर्याणी, पुलाव बनवण्यासाठी पध्दत आणि चवीनं खाण्याची मौज अनोखी होती. टमाटा, कांदा, मिरचीचा वापर आणि त्यातुन अस्सल महाराष्ट्रीयन मेनू खवय्यांसाठी अनोखी मेजवानी होती. 
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने व्हेज बिर्याणी पुलाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर महोत्सावाची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची होती. महोत्सवाला अंदाजे अठरा हजाराहून अधिक खवय्यांचा प्रतिसाद दिला.

शनिवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी चित्रपट चावडीत ‘हिडन फिगर्स’ चित्रपटाचे प्रदर्शन...



औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय आयोजित चित्रपट चावडी या उपक्रमाअंतर्गत ‘हिडन फिगर्स’ हा चित्रपट शनिवार, दि. १८ नोव्हेंबर २०१७ रोजी सायं. ५.०० वा. आईनस्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे.
नासा या अंतराळ संस्थेच्या सुरुवातीच्या काळात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या तीन आफ्रिकन -अमेरिकन वंशाच्या गणित शास्त्रज्ञ महिलांची ही प्रेरणादायी कथा आहे. कॅथेरिन जॉन्सन आणि तिच्या दोन सहकारी डोरोथी व्हॅगन आणि मॅरी जॅक्सन यांनी केलेल्या गणिती आकडेमोडीमुळे अमेरिकेला अंतराळामध्ये पाऊल टाकणे शक्य झाले. त्यामुळेच जॉन ग्लीन या अमेरिकेच्या पहिल्या अंतराळवीराला पृथ्वी प्रदक्षिणा घालता आली.
हे काम करीत असताना कॅथेरिन जॉन्सन आणि तिच्या सहकारी डोरोथी व्हॅगन आणि मॅरी जॅक्सन यांना नासा या प्रतिष्ठित संस्थेतील वंश भेदाचे अनुभवही आले. वंशभेदाच्या मर्यादा ओलांडत त्यांनी नासामध्ये गाजवलेली कारकिर्द अमेरिकन-आफ्रिकेतील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. पण त्यांचे हे कर्तृत्व मोठा काळ उलटल्यानंतर म्हणजे २०१६ मध्ये मॉर्गाट ली शटर्ली यांच्या ‘हिडन फिगर्स’ या पुस्तकाने जगासमोर आणले. याच पुस्तकावर आधारीत हा चित्रपट आहे.

चित्रपट सर्वासाठी विनामुल्य असून रसिकांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, डॉ. श्रीरंग देशपांडे, बिजली देशमुख, डॉ. मकदूम फारूकी, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव, रेणुका कड आदींनी केले आहे. ­­

Monday 13 November 2017

एकल महिलांसाठी 'स्वतंत्र धोरणाची आवश्यकता' राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न...


 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विकास अध्ययन केंद्र, कोरो, कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट, यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता या विषयावर राज्यस्तरीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यभरातून महिला वर्ग उपस्थित होता. विशेष म्हणजे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी हजर असलेल्या तृतीयपंथी यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे आणि कार्यक्रम व्यवस्थापक दत्ताबाळ सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती.








मराठवाड्यात २०१५ व २०१६ या दोन वर्षांमध्ये पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 'एकल महिला व पाणिप्रश्न' या विषयावर संशोधन अहवाल प्रसिध्द करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने औरंगाबाद येथे ९ सप्टेंबर २०१७ रोजी 'एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता' या विषयावर विभागीय चर्चासत्र आयोजित केले होते. या कार्यक्रमात झालेल्या सर्व चर्चेतून एक समान सूर समोर आला तो म्हणजे एकल महिलांसाठी 'स्वतंत्र धोरणाची आखणी' करणे गरजेचे आहे.

त्या अनुषंगाने चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमांच्या अध्यक्ष विद्या बाळ, सुजाता खांडेकर, फिरोज अश्रफ यांनी उपस्थितांना वेगवेगळ्या उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.
शहरी आणि ग्रामीण भागातील एकल महिलांच्या समस्या या विषयावर मा. दीप्ती राऊत यांनी मार्गदर्शन केले. विशेष समाज घटकातील एकल महिलांच्या या विषयावर सुजाता खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच मुस्लीम समाज्यातील एकल महिलांच्या समस्या मा. जुलेखा आणि तृतीयपंथी यांच्या समस्या माधुरी सरोदे, दिशा शेख यांनी केले.  

Friday 10 November 2017

सिंहासन सिनेमावर चर्चा


ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधूंचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या 'सिंहासन' व 'मुंबई दिनांक' या कादंबरी व कथासंग्रहातील निवडक प्रसंगांवर आधारित सिनेमा बनला-"सिंहासन". आपल्या सर्वांचा परिचित चित्रपट. १९७९ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला... संपूर्णपणे राजकारणच केंद्रबिंदू असलेला हा मराठीतील पहिला चित्रपट...सत्तेच्या सिंहासनासाठी केल्या जाणाऱ्या राजकारणावर आधारित हा सिनेमा आहे..हा सिनेमा नूकताच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये दाखविण्यात आला.
हा सिनेमा संपल्यानंतर समिक्षक व दिगदर्शक अशोक राणे यांनी १९७५ च्या काळातील काही चित्रपट आणि वास्तव यातील काही गोष्टी सांगितल्या. तसेच आता तसे चित्रपट का बनू शकत नाही ? या विचारलेल्या प्रश्नाला सुध्दा त्यांनी सुंदर दिलेलं उत्तर त्या काळात जब्बार पटेल यांना राजकीय विषयावर चित्रपट तयार करावा असं वाटलं होतं. आत्ताच्या तरूणाला वाटतं नाही. ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी १९७५ च्या काळातील राजकारण आणि संघटना याबाबतच्या घटना सांगून आठवणींना उजाळा दिला.

"दिव्यांग कट्टा" संपन्न...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि अपंग हक्क विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी १० नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी ३ वाजता "दिव्यांग कट्टा"चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अपंग स्टॉलधारकांच्या समस्या या विषयावर चर्चा करण्यात आली. आलेल्या दिव्यांग व्यक्तींची विचारपूस करून त्यांच्या अपंग स्टॉलधारकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यानंतर शमीद खान यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

‘चित्रपट चावडी’तर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘इक्सेन्ट्रीसीटीज ऑफ ब्लाँड हेअर्ड गर्ल’



नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार ११ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध पोर्तुगाल दिग्दर्शक मॅन्युएल डी. ऑलीवेरा यांचा ‘इक्सेन्ट्रीसीटीज ऑफ ब्लाँड हेअर्ड गर्ल’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
‘इक्सेन्ट्रीसीटीज ऑफ ब्लाँड हेअर्ड गर्ल’ हा चित्रपट एका तरूण जोडीचा प्रेमपट आहे. आगगाडीच्या प्रवासात एक तरूण एका मध्यमवयीन सहप्रवासी स्त्रीला त्याच्या आयुष्यात आलेल्या एका सुंदर तरूणीबद्दल सांगतो. चायनीज पंखा धारण करणार्‍या त्या तरूणीच्या प्रेमात पडलेल्या ह्या तरूणाची काय अवस्था होते ते पहाण्यासाठी अवश्य या. २००९ मध्ये पोर्तुगीज येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ६४ मिनीटांचा आहे.
‘इक्सेन्ट्रीसीटीज ऑफ ब्लाँड हेअर्ड गर्ल’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे. 

Thursday 9 November 2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची आढावा बैठक


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नूकतीच बैठक प्रतिष्ठान मध्ये पार पडली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या राज्यभरातल्या केंद्रांनी केलेल्या कामांची माहिती दिली. २०१८ ची रूपरेषा आगोदरच ठरवावी असं बैठकीत सुचवण्यातं आलं.

"सहकारी गृहनिर्माण संस्था"एकदिवशीय माहिती कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे "सहकारी गृहनिर्माण संस्था" कायदा आणि नियम यासंदर्भात एकदिवशीय माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये कायदा आणि नियम यासंदर्भात प्रभाकर चुरी हे २ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ ते ५ यावेळेत प्रक्षिणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होण्या-या प्रक्षिणार्थीं कडून २५० रूपये शुल्क आकारले जाईल. ही कार्यशाळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई जन.जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होईल. या कार्यशाळेसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. संपर्क - ८२९१४१६२१६, २२०४५४६०.

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता (राज्यस्तरीय चर्चासत्र)


मराठवाड्यात २०१५ व २०१६ या दोन वर्षांमध्ये पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 'एकल महिला व पाणिप्रश्न' या विषयावर संशोधन अहवाल प्रसिध्द करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने औरंगाबाद येथे ९ सप्टेंबर २०१७ रोजी 'एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता' या विषयावर विभागीय चर्चासत्र आयोजीत केले होते. या कार्यक्रमात झालेल्या सर्व चर्चेतून एक समान सूर समोर आला तो म्हणजे एकल महिलांसाठी 'स्वतंत्र धोरणाची आखणी' करणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विकास अध्ययन केंद्र, मुंबई, कोरो-मुंबई, कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट, मुंबई या सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण केंद्र, जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१ येथे राज्यस्तरीय चर्चासत्र सोमवारी १३ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ९ ते ३ तीन यावेळेत आयोजीत करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांमधील महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणा-या व्यक्ती व संस्थांना या चर्चासत्राकरिता आमंत्रित करीत आहोत.
या चर्चासत्रासाठी आपला सहभाग महत्त्वपुर्ण आहे. आपण ह्या सगळ्या प्रक्रियेत सहभागी झालात तर एकत्र मिळून एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाचा प्राथमिक मसुदा शासनाला २०१८ साली जागतिक महिला दिनी सादर करता येईल, असे आम्हांस वाटते. यासाठीचे चर्चासत्र आणि पुढील धोरणाची मांडणी करण्यासाठी आपली संस्थाही या प्रक्रियेत सोबत जोडली जावी असे आम्हाला वाटते, तरी आपल्या संस्थेतील दोन प्रतिनिधिंना या चर्चासत्रात सहभाग नोंदविण्याकरिता पाठवावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
विशेष सुचना : चर्चासत्रातील सहभाग निशुल्क असून उपस्थित प्रतिनिधींच्या चहा नास्ता व भोजनाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आलेली आहे. चर्चासत्राकरीताची नोंदणी अनिवार्य असून शनिवार, दि. ११ नोव्हेंबर २०१७ रोजी पर्यंत नोंदणी करण्यात यावी. नोंदणी करीता संपर्क - मनिषा खिल्लारे (७०२०२९९६७७)

अपंग स्टॉलधारकांच्या समस्यावर चर्चा


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि अपंग हक्क विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी १० नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी ३ वाजता "दिव्यांग कट्टा"चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये अपंग स्टॉलधारकांच्या समस्या या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अधिक लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विजय कान्हेकर यांनी केले आहे.

Sunday 5 November 2017

जीएसटी कायद्या मध्ये जागतिक विक्रम ठरावा इतक्या दुरुस्त्या



जीएसटी कायद्या मध्ये जागतिक विक्रम ठरावा इतक्या दुरुस्त्या आत्तापर्यंत झाल्या आहेत, व करत राहाव्या लागणार आहेत. हट्टीपणा व श्रेय घेण्यासाठी उतावळेपणा यातून हे घडते आहे, असं मतं अर्थविषयक सल्लागार अजित जोशी यांनी नूकतेच झालेल्या  कार्यक्रमामध्ये व्यक्त केले.
 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र कोकण, ठाणे आणि युवाराज प्रतिष्ठान, बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “जीएसटी - काही अनुक्तरीत प्रश्न” यावर आयोजित केलेल्या विशेष व्याख्याना मध्ये ते बोलत होते.
सरकारने जीएसटी कायद्याची अंमलबजावणी अत्यंत अनावश्यक घाईने व पुरेश्या नियोजना अभावी करण्याचा प्रयत्न केला आहे. योग्य सॉफ्टवेअर सुद्धा तयार करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्याचा परिणाम असंघटीत छोट्या उद्योग धंद्यांवर विपरीत झाला आहे. असंही ते यावेळी म्हणाले.
जेष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी इतर अनेक देशातील(सिंगापूर ते ब्राझील ) जीएसटी च्या अंमलबजावणीची उदाहरणे देऊन आपल्या देशातील अंमलबजावणी मधील दोष व त्रुटी मांडल्या. अमेरिकेत जीएसटी का लागू करण्यात आला नाही, हेही उदाहरणे देऊन स्पष्ट केले. आणि  भारतात लागू करण्यातील अडचणी व अडथळे समजावून सांगितले. याबाबत उद्योग व व्यवसायनुसार परिषदा घेऊन चर्चा घडवून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन आशिष दामले केले होते. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला दत्ता बाळसराफ, सुनिल तांबे आणि पद्मभूषण देशपांडे हे मान्यवर उपस्थित होते.

सृजनतर्फे विज्ञान खेळणी कार्यशाळा संपन्न








यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या सृजन विभागातर्फे विज्ञान खेळणी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. या कार्यशाळेत 60 मुलांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत विज्ञान शिक्षण आणि ऊर्जा संवर्धन संस्थेचे संचालक अभय यावलकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत यावलकर यांनी मागलेव्ह, फ्लिकरिंग फिश, स्नेक, उपगोइंग टॉयस, स्ट्रोफालुट, स्प्रिंकलर आणि टोपीशंकर हे सर्व कसे बनवतात सांगून, सर्व मुलांच्या कडून त्याची प्रात्यक्षिके करून घेतली.

Friday 3 November 2017

सृजनतर्फे विज्ञान खेळणी कार्यशाळा


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या सृजन विभागातर्फे रविवारी ५ नोव्हेबर सकाळी १० वाजता सृजनतर्फे विज्ञान खेळणी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. या कार्यशाळेत अधिक मुलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.