Sunday 19 November 2017

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे यंदाचा राज्यस्तरीय पारितोषिक श्री. भुजंगराव कुलकर्णी यांना जाहीर..

त्यांचा थोडक्यात परिचय


भुजंगराव आप्पाराव कुलकर्णी मूळचे बीड जिल्हा परळी तालुक्यातील पिंपळगावचे. ५ फेब्रुवारी १९१८ चा त्यांचा जन्म. अंबाजोगाई, संभाजीनगर ते हैदराबाद असा त्यांचा शैक्षणिक प्रवास. १९३९ मध्ये त्यांनी हैदराबाद राज्याच्या प्रशासकीय सेवेत कारकीर्दीला सुरुवात केली. हैदराबाद राज्यातच ते उपसचिव पदापर्यंत पोहोचले. पुढे देश स्वतंत्र झाला, मराठवाडाही निजामाच्या जोखडातून मुक्त झाला तेव्हा भुजंगरावांची कारकीर्द ही नांदेडच्या जिल्हाधिकारीपदापासून सुरू झाली. संभाजीनगरातही ते १९५६ ते १९५९ या कालावधीत जिल्हाधिकारी होते. पुण्याचे मनपा आयुक्त, मुंबईचे विभागीय आयुक्त अशी पदे भूषवत ते जनगणना मोहिमेचे प्रमुख, मंत्रालयात नगरविकास, आरोग्य, गृहनिर्माण आणि जलसंपदासारख्या विभागाचे सचिव होत १९७४ मध्ये शासकीय सेवेची ३५ वर्षे पूर्ण करीत ते निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीलाही आज ४३ वर्षे पूर्ण झालेली आहेत. आपल्या खात्याचा अतिशय बारकाईने अभ्यास करीत. खात्यांतर्गत सुधारणा घडवून आणण्यात भुजंगरावांचा हातखंडाच होता. शासकीय सेवेत असताना मनाजोगे सामाजिक कार्य करताना काही बंधने असतात, भुजंगराव या बाबतीत असे सुदैवी की, शासकीय सेवेच्या कार्यकाळात यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादांसारखे पारखी नेतृत्व लाभले होते, तर पद्मविभूषण गोविंदभाईंसारखी अतिशय तळमळीने मराठवाड्याच्या विकासाला वाहून घेतलेल्या मंडळींची त्यांना निवृत्तीनंतर प्रदीर्घ काळ सोबत लाभली. त्याच संस्कारांचे परिणाम म्हणून की काय आज शंभराव्या वर्षात पदार्पण करतानासुद्धा भुजंगराव हे मनाने तरुण आणि खंबीरच आहेत. निवृत्तीनंतर भुजंगराव कुलकर्णी यांनी गोविंदभाईंच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. शासनानेही त्यांच्या अनुभवाचा वापर करून घेत त्यांच्यावर अनेक प्रकारच्या जवाबदाऱ्या सोपवल्या. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, न्हावाशेवा बंदराचे अभ्यासप्रमुख, कुटुंब नियोजन अभ्यासगट प्रमुख, मागास जिल्हे अभ्यासगट अध्यक्ष, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष, बॅकलॉग समितीचे अध्यक्ष तर सिंचन आयोग, कापूस एकाधिकार, अनुशेष अभ्यासक दांडेकर, उत्पन्न बाबींची अभ्यास समिती, राज्य नियोजन मंडळ, तांत्रिक शिक्षण अनुशेष समिती, नोकऱ्यातील अनुशेष शोध समिती, विद्यापीठ स्थापना समिती यासारख्या अनेक समित्यांचे ते सदस्य होते. एका परीने निवृत्तीनंतरही त्यांनी विविध समित्यांवर, मंडळांवर तब्बल २६ वर्षे अर्धशासकीय कामच केले. गोविंदभाईंमुळे भुजंगराव सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत आले आणि कायमस्वरूपी ते या संस्थेचे होऊन गेले. संस्थेचे ते तब्बल २३ वर्ष उपाध्यक्ष होते. धर्माचे अवडंबर न माजवता धार्मिक वृत्तीने जगणे त्यांनी अंगीकारलेले असल्यामुळे जेव्हा सरस्वती भुवनच्या इमारतीचे काम पूर्ण झाले तेव्हा नव्या वास्तूची वास्तुशांती झाली पाहिजे असे शाळेत शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या पालकांना वाटत होते. मात्र संस्थाध्यक्ष बापूसाहेब काळदातेंनी वास्तुशांतीस नकार दिला. मात्र पालकांची अडचण ओळखून भुजंगरावांनी वास्तुशांतीला केवळ मान्यताच दिली नाही तर स्वतः प्रत्येक धार्मिक विधीमध्ये सहभागही घेतला. आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना ते म्हणतात, नियमित योगासने, आयुष्यभर शाकाहार, मद्यपान, धूम्रपानापासून कायम दूर, कोणत्याही कामात सतत गुंतवून घेण्याची सवय, पुस्तक वाचन आणि लेखन हे आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे. चार प्रकारचे प्रत्येकी १३ पत्ते असतात. यात डाव येण्याची लाखात एकदाच वेळ येते. तुमच्या वाट्याला चांगले पत्ते असतील किंवा नसतीलही. मात्र हातात आहे त्या पत्त्यावर चांगल्यात चांगला डाव खेळणे आपल्या हातात असते. ब्रिजमधील हेच कौशल्य जीवनातही वापरावे लागते, अशा शब्दांत भुजंगराव आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतात.

No comments:

Post a Comment